Tuesday, 27 December 2016

कासव : organic, mystic आणि spiritual कॉफी ! - अभिजीत कदम.

कासव : organic, mystic आणि spiritual कॉफी !
                                                                     - अभिजीत कदम.


      काल पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकरांचा " कासव " अनुभवला. अनुभवला यासाठी कारण या जोडीचे सिनेमे पाहण्यापेक्षा अनुभवता येतात असं मला वाटतं.  झोक्यावर नुसतं बसणं आणि झोक्याचा अनुभव घेणं यात जसा फरक आहे तसाच फरक चित्रपट पाहणं आणि अनुभवणं यात आहे.
    "कासव" डोक्यातुन जात नव्हता म्हणुन डोक्यातुन जेवढा काढता येईल तेवढा इथं काढलाय. (याला review म्हणता येणार नाही)

                                 


         १. U. S. मध्ये आरामी आयुष्य जगत असूनही भिन्न स्वभावी/व्यस्त नवरा आणि सोळाव्या वर्षी independant झालेला मुलगा यामुळं जानकी (इरावती हर्षे) खुप एकटी पडलेली असते. ती divorce च्या process मध्ये असते. एकटेपणामुळं आलेलं नैराश्य आणि आत्महत्येचा विचार तिलाही येऊन गेलेला असतो. यातून सुटण्यासाठी तिनं एका psychiatrist चा सल्ला घेतलेला असतो, तिची treatment सकारात्मकरित्या चालू असते.   भारतात आल्यावर तिची ओळख दत्तुभाऊंशी (डॉ. मोहन आगाशे) होते, जे ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातीच्या (त्यांची अंडी आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा समुद्रात जाणारी लहान पिल्लं ) संवर्धनासाठी प्रकल्प चालवत असतात. तिलाही तो प्रकल्प आणि एकूणच दत्तुभाऊंची त्या प्रकल्पाकडं पाहण्याची दृष्टी खूप आवडते आणि तीपण या प्रकल्पाचा भाग होते.
         एकदा प्रवासात तिला एक अशक्त तरुण (मानव : आलोक राजवाडे) एका हॉटेलबाहेर पडलेला दिसतो, ती त्याला घरी आणते. पुढं समजतं की तोपण नैराश्यानं ग्रासलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या स्वतःच्या treatment बरोबर ती त्याला त्याची space देऊन, त्यालाही treat करण्याच्या प्रयत्नात असते.

        २. या कथानकाला समांतर आणखी एक प्रक्रिया चालू असते. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांनी समुद्रातून बाहेर येऊन अंडी घातलेली असतात आणि 55/58 दिवसांनी त्यातून छोटी पिल्लं बाहेर येऊन लगेच ती समुद्रात येऊन मिळणार असतात.
        दत्तुभाऊंच्या सांगण्यानुसार ही प्रजाती डायनोसॉर च्या आधीची असून अजून अस्तित्वात आहे, सगळ्यात पुरातन असणारी प्रजाती आणि म्हणून यांना वाचवणं म्हणजे सजीवसृष्टी वाचवण्यासारखं आहे!
     
       ३. एका छोट्याश्या उपकथानकात कोकणातील दशावतारात अश्वत्थात्म्याची कथा दाखवली जाते / त्याचा उल्लेख केला जातो.
 "अश्वत्थामा अमर होता पण त्याची जखम आणि वेदना मृत्यपेक्षा वाईट होत्या" असा उल्लेख येतो.

        ४. जाणकीकडं बहुधा लोकगीत लिहिलेली ( बहुतेक handmade recycled paper ची ) डायरी असते, त्यातली २ गाणी : लहर समंदर रे आणि अपने ही रंग मे.
          मानव कधीकधी आर्त स्वरात निःशब्द काहीतरी गात असतो / फक्त आलाप. आणि "अपने ही रंग मे" जानकी गात असताना आर्त आलापात तिच्याबर गातो.
          मानवाच्या डायरीत जनकीला त्याच्या कविता दिसतात, absurd कविता, त्या आर्त स्वरातल्या निशब्द गाण्याशी नातं सांगणाऱ्या !

      ५. कोकणातील किनाऱ्यावरील ते गाव, गावाचा arial सुंदर view.      मानवला मासे पकडण्याच्या जुन्या आणि नव्या पद्धतीबद्दल सांगणारा यदु: जनकीचा ड्राइव्हर ( किशोर कदम ),मासे पकडण्याची जुनी पद्धत कशी sustainable, सामूहिक,जिवंत माणसाळलेली तर नवी कशी यांत्रिक, निर्जीव आहे हे त्याच्या शब्दात सांगतो.
         त्या गावातील स्टँडवर चहा विकणारा लहान मुलगा स्टँडवरच राहणाऱ्या म्हाताऱ्याला आजोबा म्हणून त्याला फुकट चहा देतो, मानवला समुद्राच्या तारुण्याबद्दल सांगतो. त्याच्या इवल्याश्या वयात आलेलं शहाणपण मानवाला सांगून त्याला चकित करतो.
       


        दुधात थोडी कॉफी आणि थोडी साखर टाकुन एकत्र मिसळून, गरम करून जशी मस्त कॉफी तयार होते, आणि त्यात दूध, साखर असूनही आपण त्याला कॉफी म्हणतो आणि पितो. तेव्हा दुधाचं, साखरेचं किंवा कॉफीचं स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. आणि तो कॉफी नावाचा नवीन पदार्थ पिऊन झाल्यावरही जिभेवर बराच काळ रेंगाळतो. "कासव"  तसाच आहे.

         वर नमूद केलेल्या ठळक ५ गोष्टी आणि आणखीही लहान तरी महत्वाच्या ( god is in details अशी एक quote आहे movie मध्ये )गोष्टींनी कासवापुरता मर्यादित न राहणारा पण कासवाशिवाय अर्थही नसणारा असा  "कासव" आहे.

       "देवराई", "नितळ", "अस्तू" आणि आता " कासव " पाहताना एक समान अनुभव आला. असाच अनुभव " विहीर " , "ship of theseus" पाहताना आणि " देऊळ " मधील शेवटचा scene पाहतानाही आला होता. हे सगळे सिनेमे पाहून झाल्यावर मन खूप शांत झालं होतं, कुणाशी काही बोलू वाटलं नव्हतं. विशेषण द्यायचं झालं तर "Organic" , "spiritual", "mystic" अशी विशेषणं यांना देता येतील. किंवा माझ्यापुरते हे सिनेमे या विशेषणांच्या  एका वर्गात वर्गीकृत करता येतात. "ऊर्जा अक्षय्यतेचा नियम" शिकल्यानंतर आणि १२वी मध्ये कुठलीतरी science fiction वाचल्यानंतर अशीच मानसिक स्थिती झाली होती.

"कासव" किंवा वर नमूद केलेले सिनेमे हे अनुभवायला खूप चांगले वाटले. त्यांच्यात एकरूप झाल्यासारखं वाटलं. बऱ्याच गोष्टी आकलनाच्या पलीकडं होत्या त्यांचं आकलन झालं असतं तर आणखी चांगल्याप्रकारे "कासव" अनुभवता आला असता / त्याच्याशी एकरूप होता आलं असतं.

"अस्तु" पाहतानाही असंच झालं होतं. संस्कृत मधील श्लोक आणि "सोहम्.." गाण्याचं आकलन आणि त्यांचे सिनेमातील संदर्भ याच आकलन झालं नव्हतं.
"कासव" मध्येही काही गोष्टींचं आकलन नाही झालं. जानकी मानवाला "Niche" नावानं हाक मारत असते. त्या "Niche" चा संदर्भ समजला नाही.


सिनेमातील २ गीतं सुनील सुकथनकरांनी लिहिली आहेत.
"लेहरे समंदर रे..."
संगीत : साकेत कानेटकर.
गायिका : सायली खरे.

आणि "अपने ही रंग मे..."
संगीत : साकेत कानेटकर.
गायिका : सायली खरे ,
गायक : आलोक राजवाडे.

दोन्ही गाणी हरवून टाकणारी आहेत! अगदी विरघळून जातात सिनेमात, आणि आपण या गाण्यात !
मी movie पाहून झाल्यावर साकेत कानेटकरला fb वर शोधलं, त्याने दोन्ही गाणी soundcloud वर ऐकण्यासाठी उपलब्ध केली आहेत. आणि मला त्याच्या profile वर "अस्तू" मधील कन्नड अंगाई सुद्धा मिळाली. ज्यांनी "अस्तू" पहिला असेल त्यांना नक्कीच हे गाणं हवं असेल, त्यांना soundcloud वर साकेत च्या profile वर ती अंगाई मिळेल.

वर लिहिलेले सिनेमे तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला हा सिनेमाही अनुभवायला नक्कीच खूप आवडेल.